गोवा/पणजी (अभिजीत रांजणे) :-
आपल्या देशातील इतर प्रदेशांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुजराती चित्रपटांना इफ्फीसारख्या व्यासपीठांची गरज आहे. अडथळे दूर करणे आणि अधिक व्यापकतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे ही गुजराती चित्रपटसृष्टीसाठी काळाची गरज आहे, असे ज्येष्ठ गुजराती अभिनेता सिद्धार्थ रांडेरिया यांनी आज गोव्यात 54 व्या इफ्फीमध्ये ‘हुर्रे ओम हुर्रे’ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
‘गुजराती चित्रपटांचे सौंदर्य आणि त्यातील चित्तवेधक कथाकथन याबद्दल जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे’, असे ते म्हणाले.

54 व्या इफ्फीमध्ये ‘हुर्रे ओम हुर्रे’”च्या प्रीमियरबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेता रौनक कामदार म्हणाला की, अलिकडच्या वर्षांत’ हिलारो” सारख्या अनेक समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या गुजराती चित्रपटांना इफ्फीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.
‘हुर्रे ओम हुर्रे’ या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना दिग्दर्शक निसर्ग वैद्य म्हणाले की, या चित्रपटात गुजराती समाजाच्या भावना बारकाईने टिपल्या असून त्यांची संस्कृती त्यातून प्रतिबिंबित होते. “प्रेक्षकांशी समरस होणे आणि शक्य तितक्या स्वरूपात वास्तववादी कथा मांडणे याचा प्राधान्याने विचार केला जातो. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची संस्कृती आहे, म्हणूनच तो विलक्षण असतो. चित्रपटातील नर्मविनोदी आशय प्रेक्षकांना पडद्याशी खिळवून ठेवेल” असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केला.

इफ्फी 54, गोवा येथे आज प्रीमियर विभागात ‘हुर्रे ओम हुर्रे’ हा चित्रपट दाखवण्यात आला.

चित्रपटाचा सारांशः दीर्घकाळापासूनचे मित्र असलेले ओम आणि विनी यांच्याविषयीचा हा चित्रपट आहे, जेव्हा विनीने ओमसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यानंतर एकेकाळी एकमेकांमध्ये गुंतलेल्या त्या दोघांमधे ओममुळे दुरावा येऊ लागतो आणि विश्वासघाताच्या भावनेने विनी अस्वस्थ होते. अशा निराश अवस्थेत, त्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारी अनपेक्षित घटना घडते, आणि त्यातून त्यांच्या जगण्याचा मार्गच बदलतो.
