
दर्पण न्यूज मुंबई/भिलवडी :-
महाराष्ट्रातील शेतकरी हा आर्थिदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि आपण शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे व त्यांना शक्य तेवढी मदत दिली पाहिजे हे तत्व स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी नेहमीच जपलं. मग ते सरकारच्या माध्यमातून असो की भारती विद्यापीठाच्या माध्यमातून असो. त्यांनी घालून दिलेला हा आदर्श नेहमीच जपत आलो आहे.
आज आपण एकीकडे दिवाळी साजरी करतोय. मात्र या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याने अनेकजण आर्थिक संकटात आहेत. अनेक संसार उध्वस्त झाले असून शेतीचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. ते सगळे सावरले पाहिजेत आणि त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी यासाठी भारती परिवार आग्रही राहिला आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या रुपाने पूर्वी मदतीचा हात दिलेला आहे. या पूरग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी बळ देणेसाठी भारती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा स्व. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून २ कोटींची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सुपूर्द केली.
यावेळी राज्यातील विविध राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक विषयांवर त्यांच्यासमवेत विस्तृत चर्चा झाली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय, जनतेच्या अपेक्षा आणि समाजातील विविध घटकांच्या प्रगतीसाठी राबवायच्या उपक्रमांवरही अनेक बाबी चर्चेदरम्यान मांडल्या.
याप्रसंगी समवेत कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम सर, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप उपस्थित होते.