कडेगांव येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखात
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी , अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे , माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार व दिग्गज मान्यवरांची उपस्थिती : लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी
कडेगांव:
महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा लाखो लोकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा कॉंग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मा. रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. खा. मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते मा. आ. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री मा. आ. पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. आ. विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते मा. आ. सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले की,
असंख्य नागरिकांच्या साक्षीने झालेला हा दिमाखदार हृदयस्पर्शी सोहळा अविस्मरणीय ठरला. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून पलूस-कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचा कायापालट घडवून आणला. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांना त्यांच्या राजकीय वाटचालीत श्रीमती इंदिराजी गांधी, यशवंतरावजी चव्हाण, यशवंतराव मोहिते भाऊ, सोनियाजी गांधी आदींचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांपासून कदम परिवाराचे कॉंग्रेस पक्ष व गांधी परिवाराशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे नाते कायम आहे. माननीय खा. राहुलजी गांधी हे देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहेत. केवळ सांगली जिल्हा व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश या लढाईत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे आभार मानून स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद यापुढील काळातही कायम मिळत राहो, असेही आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील अनेक राज्यातील नेते मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिक या सोहळ्याची खरे साक्षीदार ठरले.