दर्पण न्यूज मिरज / सांगली : बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित हॉटेल, कंपनी, वीट भट्टी अथवा कोणतीही आस्थापना असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्या व्यवसायाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच वीजपुरवठा, पाणीपुरवठा इतर सर्व सोयी सुविधा सर्व शासकीय विभागाकडून ताबडतोब खंडीत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल कामगार कृतीदल समिती अध्यक्ष डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले.
मा. मंत्री (कामगार) यांनी दिलेल्या निर्देशानुसार बालकामगार (प्रतिबंध व विनियमन) नियम, 1997 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संबंधित संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे तसेच सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी संघटना, मालक व कामगार संघटना उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा बालकामगार कृतीदल मार्फत मा. मंत्री (कामगार) यांच्या निर्देशाप्रमाणे ज्या ठिकाणी बाल कामगारांच्या रोजगाराला प्रतिबंध केले आहे आणि जेथे जोखीमकारक व्यवसाय आहे, अशा ठिकाणांच्या तपासण्या करण्यासाठी माहे जुलै 2026 मध्ये बालकामगार धाडसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी 14 वर्षाखालील बाल कामगार अथवा 16 वर्षाखालील किशोरवयीन कामगार कोणत्याही क्षेत्रात काम करताना अढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा सहाय्यक कामगार आयुक्त, सांगली कार्यालयास अवगत करावे. बाल अथवा किशोरवयीन कामगार काम करताना आढळल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द उक्त अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल. संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ रद्द करुन ती आस्थापना बंद करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी योग्य ती नोंद घ्यावी, अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सर्व संबंधितांनी आपल्या आस्थापनेत बाल अथवा किशोर कामगार कामास ठेऊ नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी यावेळी केले.