राजकीयमहाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघात शांततेत सुमारे 58 टक्के मतदान :   जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

      सांगली  : 44-सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन गेली तीन महिने अतिशय नियोजनपूर्व प्रयत्न करीत होते. त्या प्रयत्नाचे फळ म्हणून सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक  अतिशय शांततेत पार पडली. त्याबद्दल सर्वप्रथम जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक ‍ जिल्हाधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते.

आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या. यावेळी लोकांचा उत्साह दिसला. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नवमतदाराबरोबरच नवदांपत्य, 100 वर्षावरील वृध्द, दिव्यांग, तृतीयपंथी, महिला आदींनी आपला सहभाग नोंदवून लोकशाही बळकटीकरणास आपले योगदान दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले, आज जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजित 58 टक्के इतके मतदान झाले. परंतु अद्यापही 119 मतदान केंद्रावर सायंकाळी 6 नंतरही मतदारांच्या रांगा होत्या. त्या सर्वांचे मतदान घेतले जाईल. त्यामुळे जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी सर्व विभागांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले. या सर्वांच्या टीमवर्कमुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मदत झाली.

44-सांगली लोकसभा मतदारसंघात मॉकपोलच्या वेळी  B.U – 7, C.U. – 6 आणि 11 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. तद्नंतर सायंकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रियेदरम्यान 18 मतदान केंद्रांवर  B.U – 8, C.U. – 4 आणि 17 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यात लोकसभेसाठी 2 हजार 448 मतदार केंद्रांवर मतदान पार पडले. यापैकी 1 हजार 224 मतदान केंद्राचे वेबकास्टींग करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वीत करण्यात आलेल्या नियंत्रित कक्षातून वेबकास्टींग करण्यात आलेल्या केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती.

लोकसभेच्या मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती दर्शवून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढीलप्रमाणे. 281 मिरज – 59.99 टक्के, 282 सांगली – 57.50, 285 पलूस-कडेगाव – 56.44, 286 खानापूर –  51.11, 287 तासगाव-कवठेमहांकाळ 61.16 व 288 जत  विधानसभा मतदारसंघात 59.32 टक्के इतके अंदाजित मतदान झाले.

जसे मतदान पूर्ण होईल त्या प्रमाणे अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या सर्वांना धन्यवाद देवून  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  यांनी आभार मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!