


दर्पण न्यूज सांगली:- सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर तिनपटीपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे.
महागाईने कंबरडे मोडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महापालिकेने करवाढ लादून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी तीव्र टीका
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मुख्य आरोप व मुद्दे :
निकृष्ट नागरी सुविधा असूनही घरपट्टीत प्रचंड वाढ
रस्ते, गटारे, पाणीपुरवठा व स्वच्छतेची अत्यंत वाईट अवस्था
मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव
नागरिकांच्या हरकतींकडे प्रशासनाचा दुर्लक्ष
नगरसेवकांचे संशयास्पद मौन व प्रशासनाला अप्रत्यक्ष पाठबळ
“जनतेचा पैसा लुटण्यासाठी नव्हे, तर विकासासाठी असतो. सुविधा शून्य आणि कर मात्र तिप्पट – हा सरळसरळ अन्याय आहे,” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
संघटनेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की,
“वाढीव घरपट्टी आदेश तात्काळ रद्द करा, अन्यथा सांगली, मिरज व कुपवाड महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.”
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाविरोधात कायदेशीर लढा उभारला जाईल तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. परिस्थिती बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
या आंदोलनाला उपस्थित पदाधिकारी :
पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे,
सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे,
चेतनाताई नागवंशी, संगिताताई शिंदे,
जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे,
कार्याध्यक्ष जगदिश कांबळे,
महासचिव अनिल मोरे (सर),
उपाध्यक्ष किशोर आढाव,
कोषाध्यक्ष हिरामण भगत,
मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे,
सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे,
सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे,
युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने,
महासचिव नविनकुमार कांबळे,
मिरज तालुका उपाध्यक्ष प्रमोद मल्लाडे,
मानतेश कांबळे, दिपक कांबळे, शंकर ऐवळे आदी उपस्थित होते.
संघटनेची ठाम भूमिका :
“जनतेच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. अन्यायकारक कर रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”