दर्पण न्यूज धाराशिव,प्रतिनिधी (संतोष खुने) :- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, २००२ मधील मतदार यादी आणि सध्याच्या यादीतील नावे जुळविताना विविध अडचणी निर्माण होत असल्याने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय एजंटांची (बीएलए) नियुक्ती करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.चोक्कलिंगम म्हणाले की,शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत बीएलए यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे.धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने १५२३ बीएलए नियुक्त केले आहेत.मात्र,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना, शिवसेना (उबाठा),वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्षांकडून अद्याप बीएलएची नियुक्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे स्थानिक स्तरावर मतदार मॅपिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादी पुनर्नरीक्षण प्रक्रियेदरम्यान बीएलओंनी प्रत्येक घरी भेट देऊन संबंधित सदस्यांची माहिती,आवश्यक पुरावे घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास प्राधान्य द्यावे,असे निर्देश श्री.चोकलिंगम यांनी दिले.तसेच नाव,वय किंवा अन्य तपशील बदलायचा असल्यास जन्म दाखला,फोटो,स्वाक्षरी यांसारखे आवश्यक पुरावे संकलित करून ते ऑनलाइन अपलोड करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.