आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मराठी भाषा दिनाला मान्यवरांचा सूर विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

दर्पण न्यूज कोल्हापूर : मराठी भाषेला रोजगार देणारी भाषा बनविणे आवश्यक आहे. सोबतच माय मराठीला घराघरात, मनामनात रुजवण्यासाठी प्रत्येकाने आपण काय प्रयत्न करु शकतो. याचे आत्मचिंतन केल्यास मराठी भाषा जगातली प्रमुख भाषा म्हूणन पुढे येण्यात कोणतीही अडचण नाही, असा सुर आज येथे व्यकत् करण्यात आला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर येथे आज मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. या निमित्त विविध वक्त्यांनी माय मराठीच्या समृध्दी बद्दल आपले मत व्यकत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके होते. यावेळी मराठी भाषेच्या समृध्दी संदर्भात साहित्यिक, मराठी भाषा अभ्यासक तथा नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्सचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी तर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार, समीर देशपांडे, ऊर्दु व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेख यांनी आपले मत प्रदर्शन केले.

 मराठी भाषेचा गौरव व्हावा, जतन व संवर्धन व्हावे, वर्तमान व भविष्यावर चर्चा व्हावी, यासाठी महान साहित्यिक कवी कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. पण मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीला रोजगार देणारी भाषा म्हणून रुजवली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी व्यक्त करुन मराठी टिकविण्यासाठी बोली भाषा या ज्ञान भाषा झाल्या पाहिजेत तसेच भाषेमध्ये इतर भाषांचा शिरकाव रोखला गेला पाहिजे नाही तर मुळ भाषा नामषेश होतील. मराठीचे वर्तमान आणि भविष्य या संदर्भात संशोधन व्हावे, या दृष्टीने मराठी भाषा गौरव दिनाकडे पहावे असे ते म्हणाले.

मराठी भाषा वाढविण्यासाठी आपण काय करु शकतो याचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या घरातून त्यासाठी सुरुवात केली पाहिजे, घरामध्ये पुस्तक, कविता, वृत्तपत्रांचे वाचन झाले पाहिजे, असे मत  विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनी व्यकत् करुन मराठी भाषेचे महत्व वाढविण्यासाठी आणि माझी माय बोली मराठी वाचविण्यासाठी घराघरामध्ये चांगली मराठी कशी बोलता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

ऊर्दु व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेख यांनी प्रत्येकाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. त्याच बरोबर आपण जी भाषा बोलतो त्या भाषेवर आपले प्रभुत्व असले पाहिजे असे सांगून महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये  5 वी पर्यत मातृभाषा मराठी हा विषय सक्तीचा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठी भाषा बोलणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी आहे. जात, प्रांत, पेहराव यावरुन भाषा ठरत नाही. आपली भाषा प्रत्येकाला गोड असते त्या भाषेवर त्यांचे प्रेम असते. महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा हा मराठी भाषिक असल्याचे प्रास्ताविकामध्ये उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी सांगून, महान साहित्यिक  कवी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा हा दिन मराठी भाषा गौरव दिन सोहळा भाषेच्या संवर्धनाचा आणि अभिमानाचा संदेश देणारा ठरेल असे मत व्यक्त केले.

प्रारंभी महान साहित्यिक कवी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पाजंली अर्पण केली. या कार्यक्रमाला असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सम्राट सणगर, सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले. माहिती अधिकारी फारुक बागवान उपसंपादक रणजित पवार,  प्रसारमाध्यमातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले. आभार माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!