खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण ; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश
पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर ; देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट


दर्पण न्यूज मिरज/ सांगली- : खानापूर शहर भुईकोट प्रकारातील किल्ल्यामध्ये वसले असून, किल्ल्याच्या तटबंदीमध्ये ९ बुरूजांची रचना केलेली होती. यापैकी गणेश बुरुज हा सध्या सुस्थितीत असलेला एकमेव बुरुज आहे. या ऐतिहासिक बुरूजाची होत असलेली दुरवस्था लक्षात घेऊन, बुरूजाचे सुशोभीकरण व देखभालीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बुरूजाच्या 306 चौ. मी. क्षेत्र जागेचे हस्तांतरण खानापूर नगरपंचायतीकडे केले आहे. यासंदर्भात स्वतंत्र हस्तांतरण आदेश निर्गमित करण्यात आला असून, तो खानापूर नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त दत्तात्रय लांघी आदि उपस्थित होते. बुरूजाचे हस्तांतरण केल्यामुळे त्याचे सुशोभिकरण होऊन खानापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार आहे. तसेच, नियमित देखभाल दुरूस्तीमुळे या ऐतिहासिक ठेव्याचे चांगल्या प्रकारे जतन होण्यास मदत होणार आहे महादेव डोंगररांगेत पठारावर स्थित खानापूर शहर हे भुईकोट प्रकारातील किल्ल्यामध्ये वसले आहे. गडाची तटबंदी जवळपास ३० ते ४० फुट उंचीची होती. यामध्ये खालील 30 फुटांचा दगडी तट व वरील ५ ते १० फुटाची तटबंदी मातीची होती. ही माती घाणीत मळलेली व चुना राख यांचे मिश्रण असलेली असल्याने दगडासारखी कठीण आहे. या तटबंदीमध्ये ९ बुरूजांची रचना केली होती. यापैकी सध्या सुस्थितीत एकमेव गणेश बुरुज आहे. या बुरूजाच्या शेजारी गावची वेस असून त्यावर सन १११९ चा उल्लेख आहे. तसेच गणेश बुरूजावर गणपतीची मूर्ती कोरली असून अजून १, २ चिन्हे आढळून येतात. त्यामुळे या बुरूजाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन या पुरातन ठेव्याचे जतन होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बुरूजाचे हस्तांतरण खानापूर नगरपंचायतीकडे केले आहे. सिटी सर्वे नंबर 930, एकूण क्षेत्र 607.50 चौ. मी. पैकी 306 चौ. मी. क्षेत्र जागा जुने पुरातन बुरूज सुशोभीकरण व देखभाल-दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी खानापूर नगरपंचायत यांना महसूल मुक्त किंमतीने अटी व शर्तींच्या अधीन राहून हस्तांतरण करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाच्या / जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करता येणार नाही. जमिनीचा ताबा दिल्यानंतर जागेवर अतिक्रमण होऊ नये, याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीवरील गौणखनिज स्वामित्व धनावरील अधिकार शासनाने राखून ठेवलले आहेत. गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणेपूर्वी सक्षम अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. मोकळ्या जागेवर झाडे लावावीत, असे आदेशात म्हटले आहे.


