कृषी व व्यापारमहाराष्ट्र

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाममध्ये सहभागासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

 

          दर्पण न्यूज सांगली :   खरीप 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना दि. 24 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पीक कापणी प्रयोग उत्पादन आधारित राबवण्यात येत आहे. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत  31 जुलै अखेर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

          ही योजना सांगली जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या अधिसूचित पिकासाठी लागू आहे. ही योजना राबविण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

          या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/ सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे खाते कार्यरत असणारी बँक शाखा/ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. याशिवाय पीक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुनही शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी  किंवा कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!