अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम हाती घ्यावी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत दिले निर्देश

सांगली: –: अंमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम, त्याबाबतचे कायदे यासंदर्भात जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घ्यावी. यातून भावी पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यापासून सुरक्षित राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, सहायक उपवनसंरक्षक सुजीत साजणे, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्हा तसेच तालुका पातळीवर आढळणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन व वापर, तसेच अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात जनजागृती व आवश्यक कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यांच्याकडील तपासणी मोहिमा अधिक गतीने कराव्यात. अंमली पदार्थांच्या जनजागृतीसाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृती कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले, समिती सदस्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ उत्पादन होत नसल्याबद्दल दक्ष राहावे. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पीक पाहणीच्या वेळी गांजा, खसखस अशा पिकांच्या लागवडीबद्दल खात्री करावी. गावस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांनी असे प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावेत. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कुरियर कंपन्यांच्या गोदामांची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. रेल्वे परिसरातील नशेखोर व्यक्तींवर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाई करावी. नियमित तपासणीसाठी मोहिम राबवावी.