महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

मेहनतीने आणि जबाबदारीने काम करुन लोकांचे उत्तरदायित्व स्विकारा :पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर जिल्हा परिषदेंतर्गत 31 उमेदवरांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेशांचे वितरण

 

दर्पण न्यूज  कोल्हापूर : शासकीय यंत्रणेत चांगल्या पध्दतीने मेहनतीने आणि जबाबदारीने काम करुन लोकांचे उत्तरदायित्व स्विकारा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमात केले. सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्ती करताना प्रतीवर्षी रिक्त झालेल्या एकुण पदांच्या 10 टक्के पदे भरण्यास मान्यता आहे. त्यानुसार 31 डिसेंबर 2024 अखेर अनुकंपा प्रतीक्षासूचीमध्ये एकुण 31 उमेदवारांचा समावेश होता. त्या सर्व उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक अर्हता व जात प्रवर्गनुसार उपलब्ध असलेल्या गट क किंवा ड पदावर नियुक्ती देण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आता स्पर्धा वाढली आहे. एमपीएसीमार्फत निवड होण्यासाठी मुलं चार-पाच वर्ष अभ्यास करतात. पण त्यापैकी चार-पाच हजार मुलांचीच निवड होते. आता मर्यादित मुलांनाच नोकरी मिळत आहे. तुम्हाला एखाद्या दुर्देवी घटनेनंतर नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्यानंतर शासकीय यंत्रणेचा फायदा करुन घेऊन मेहनतीने काम करा. नोकरी लागल्यानंतर रिटायर्ड होईपर्यंत या नोकरीच्या माध्यमातून गरजूंना मदत करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे बजावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात समृद्धी मुळे, ओमकार दिवेकर, मुदस्सीर खान या नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी व आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मानले.

*जिल्हा परिषदेचे अभिनंदन*
अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये जिल्हा परिषदेकडून जलद कार्यवाही होत असल्याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. शासकीय सेवेत असताना कर्मचारी/अधिकारी दिवंगत झाल्यास कुटुंबावर ओढावण्याऱ्या आर्थिक आपत्तीत कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने अनुकंपा नियुक्तीची योजना लागू केली. परंतु अनेक अडचणींमुळे त्याला वेळ लागतो. तरतुदीनुसार शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका पात्र वारसाने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याकरिता एक वर्षाचे आत विहित नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे. वारसदार अज्ञान असेल तर त्यास 18 वर्ष पूर्ण झालेनंतर एक वर्षाचे आत अर्ज करण्याची तरतूद आहे. शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून ही प्रक्रिया पुर्ण करून ज्यांनी अर्ज दिले होते अशा सर्व प्रलंबित विषयांना मार्गी लावून ३१ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. या केलेल्या कामाबद्दल पालकमंत्री श्री आबिटकर यांनी सर्व जिल्हा परिषद अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!