महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा :  जिल्हाधिकारी अशोक काकडे  

 

 

       दर्पण न्यूज सांगली : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. आराखडे तयार करताना संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व अन्य विभागांशी समन्वय ठेवून तयार करावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, पोलीस उपअधिक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यापूर्वीच्या सन २०१९ व सन २०२१ चेउद्भवलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन अचूक नियोजन करावे व त्यानुसार सज्जता ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी वरिष्ठाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, मोबाईल सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, कार्यालयीन दूरध्वनी सुरू ठेवावा. पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीची माहिती वेळोवेळी द्यावी. पूर परिस्थिती निर्माण झाली तर व्यक्तिंचे स्थलांतर वेळीच करावे, त्यांना निवारा केंद्र, जेवण, पिण्याचे पाणी, आरोग्य व अन्य सुविधा, जनावरांसाठी छावणी, पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी.  व्यक्तिंचे, जनावरांचे स्थलांतर करताना ते सुरक्षित ठिकाणी होईल याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयातील दप्तर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा वेळेत व अचूक करावा.

पूर परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या बोटींची व अन्य साहित्यांची तपासणी करून ते शंभर टक्के सुस्थितीत असल्याची खात्री करावी. नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे नावासह संपर्क क्रमांक आराखड्यात समाविष्ट करावेत तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्यक्षात जे काम करावयाचे आहे त्याचे मॉकड्रिल घ्यावे. बोटीमध्ये बसणाऱ्यांसाठी लाईफ जॅकेट ठेवावे. धोकादायक इमारतींची तपासणी करावी.  रोगराईच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात आवश्यक औषध साठा उपलब्ध ठेवावा. आपत्तीच्या काळात संबंधित ठिकाणी धोक्याची सूचना देण्यासाठी  यंत्रणा सज्ज ठेवावी. महावितरणने आपत्ती काळात वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो तात्काळ सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी मान्सून पूर्व तयारीच्या या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीत महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महानगरपालिका क्षेत्रात पूरपरिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली. त्याचबरोबर पाटबंधारे, आरोग्य विभाग, महावितरण, शिक्षण आदी विभागांनी केलेल्या तयारीबाबतची माहिती दिली. पूरप्रवण तालुक्यांमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत संबधित  उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी माहिती दिली.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!