दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२५ पीक स्पर्धा’ योजनेचे निकाल घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग व नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ४७७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.*
*जिल्ह्यातील राज्यस्तरीय विजेते शेतकरी*
*पिकाचे नाव, विजेता, साध्य उत्पादन क्वि./हेक्टर व क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे*.
*सोयाबीन उत्पादन:* शिरोळ येथील नारायण गंगाधर पुजारी (७६.६८ क्विंटल/हेक्टर) यांनी राज्यात द्वितीय क्रमांक आणि कागल तालुक्यातील अर्जुनवाड येथील जयश्री गणपती कुंभार (७६.४३ क्विंटल/हेक्टर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
*भात उत्पादन:* कागल तालुक्यातील सुळकुड येथील सदाशिव चनगौंडा कतगर यांनी प्रति हेक्टरी १३५.७९ क्विंटल उत्पादन घेऊन राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर कागल पिंपळगाव बु. येथील बाबासो सायगौंडा पाटील (१२०.५९ क्विंटल/हेक्टर) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
*भुईमूग उत्पादन:* राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील शिवाजी सदाशिव चौगले यांनी ५६.१५ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनासह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील दत्तात्रय बाळा कसलकर (५६.१४ क्विंटल/हेक्टर) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
*नाचणी उत्पादन:* चंदगड तालुक्यातील केनिवाडी येथील नारायण रामू कडूकर यांनी ८९.३२ क्विंटल उत्पादनासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. भुदरगड तालुक्यातील उकिर भाटले येथील वसंत मनोहर शेटगे (द्वितीय) आणि चंदगड तालुक्यातील करंजगाव येथील धोंडिबा ओमान शिट्याळकर यांनी (तृतीय) क्रमांक पटकावला.
*बक्षिसाची माहिती पुढीलप्रमाणे*- यामध्ये तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार दिले जाते.
खरीप २०२५ मधील पीकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचे कृषि विभागामार्फत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनामध्ये सातत्य राखून परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खरीप २०२६ मध्ये होणाऱ्या पीकस्पर्धा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषि उपसंचालक नामदेव परीट, आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आणि उपविभागीय कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.