दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कार्य पाहता भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल असा मला विश्वास आहे’ असे मत बक्सर, बिहारचे खासदार सुधाकर सिंग यांनी सिद्धगिरी जननी हॉस्पिटलमध्ये आयोजित ‘मातृत्व दिन’ सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सिद्धगिरी जननीच्या प्रमुख संचालिका डॉ. वर्षा पाटील, केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग, व्यवस्थापक विवेक सिद्ध प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार सुधाकर सिंग पुढे म्हणाले, “जागतिक व्यवस्थेचा अभ्यास केला असता भारत जरी लोकसंख्येत मोठा मोठा दिसत असला तरी नवीन प्रजजन होणारी पिढी व जुनी वार्ध्यक्याकडे झुकलेली पिढी यांच्या संख्येत अंतर वाढत आहे. डॉ. वर्षा पाटील यांनी लिहिलेले लेख व प्रबंध मी अभ्यासाला आहे. त्यात त्यांनी भारतात ढासाळणारी प्रजजन क्षमता याबद्दल सखोल विश्लेषण केले आहे. गतकाळात अनेक शक्तींनी जनसंख्या कमी होण्यासाठी अनेक कृत्रिम आजार तयार केल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात वंध्यत्व हि एक भीषण समस्या होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर वंध्यत्व निवारणात होलिस्टिक प्रणालीने उपचार देणारे सिद्धगिरी जननी एक अभिनव सेंटर म्हणून काम करत आहे. देशाला दिशा देणारे विधायक काम निश्चितच सिद्धगिरी जननी विभाग करेल, यासाठी ‘राष्ट्रीय समृद्ध मातृत्व अभियान’ आज पासून औपचारिकरित्या सुरु झाले असे जाहीर करतो व व डॉ. वर्षा पाटील यांनी या अभियानाचे नेतृत्व करावे अशी मी त्यांना विनंती करतो. याकरिता शासकीय स्तरावर जागृती आणण्यासाठी मी स्वतः आणि माझे अन्य संसदेतील सहकारी प्रयत्न करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो.”
यावेळी डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, “ मातृत्व हि निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान आहे. सृजनशील पिढी निर्माण करण्यात स्त्रीशक्तीचे महत्वपूर्ण योगदान आहे. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, आहार-विहार, अनुवांशिक समस्या अशा कारणांनी ३१% लोकांच्यात वंध्यत्व आढळत आहे आणि हे प्रमाण वाढत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणाली, कामकाज पद्धती, प्रदूषण , शहरी नियोजन व सामाजिक सहयोग प्रणालीत अमुलाग्र व आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. वंध्यत्व हि केवळ महिलांची समस्या नाही तर महिला व पुरुष दोघांची तपासणी होणे आवश्यक आहे. वंध्यत्व समस्या निवारणासाठी केवळ आय.व्ही.एफ. सेंटर पर्याय नाही तर जागरूकता सर्वात आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर भविष्यातील खर्चिक उपचार टाळता येतात. यासाठी जागरूकता व योग्य सल्ला उपचार घेणे गरजेचे आहे.”
यावेळी बिहारचे केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग म्हणाले, “मातृ शक्तीला या देशातील संस्कृतीने उच्च असे स्थान दिले आहे. हि समस्या इतकी भीषण रूप धारण करून आपल्या समोर येणार आहे कि भविष्यात वृद्ध लोकांची सेवा करायला हि घरात कोणी असणार नाही. त्यामुळे आत्ताच जागृत होऊन वंध्यत्व निवारणासाठी उभे राहिले पाहिजे,हि काळाची गरज आहे.”
प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, “व्यापता न येणारे अस्तित्व आणि मोजता न येणारे म्हणजे मातृत्व आहे. या सुखापासून कोणी वंचित राहू नये या संकल्पनेतून पुज्यश्री स्वामीजींच्या प्रेरनेणे व डॉ. वर्षा पाटील यांच्या निस्पुर्ह सेवा भावनेने सिद्धगिरी जननी काम करत आहे. वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या कुटुंबात एक सुखाचा दिवा लावण्याचे काम सिद्धगिरी जननी करत आहे. केवळ दोन वर्षाच्या कालावधीत शेकडो घरात मुलांचे सुख मिळाले आहे, निस्वार्थी सेवेमुळे हे शक्य आहे.” असे सांगून सिद्धगिरी जननी विभागाचा प्रवास त्यांनी यावेळी विशद केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुनीत मुचंडी यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आगामी वाटचालीची माहितीपुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. तसेच ‘समृद्ध मातृत्व अभियानाची’ सुरुवात झाली असे घोषित करण्यात आले, व उपस्थितांनी हात उंचावून अनुमोदन दिले. या कार्यक्रमात डॉ. भूषण सुतार, डॉ. सुषमा नाडीकर, डॉ.विशाल खलाटे, डॉ.सुशांत गुणे, डॉ. प्रशांत नाडीकर, डॉ. चिराग गांधी, डॉ. प्रियांका तेले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.उज्वला माळी, डॉ.आरती माने. अनुराधा शिंदे, संजय पाटील, दिगंबर पाटील किसन साळुंखे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.