स्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते* संवेदनशील वास्तुरचना ; वास्तुविशारद संतोष रामाणे यांचे प्रतिपादन

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
परंपरागत स्थानिक साहित्य आणि लोकांच्या सक्रिय सहभागातूनच खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि शाश्वत वास्तुरचना घडते, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद संतोष रामाणे यांनी केले. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर आर्किटेक्चर अँड सस्टेनेबिलिटी या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, नवी मुंबई यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रामाणे यांनी वास्तुरचना ही केवळ इमारत उभारण्याची प्रक्रिया नसून ती सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जाणिवांशी जोडलेली असते, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, स्थानिक माती, दगड, लाकूड यांसारख्या साहित्याचा अभ्यासपूर्वक वापर केल्यास बांधकाम अधिक पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि टिकाऊ ठरते. लोकसहभागातून उभारलेली वास्तू ही त्या परिसराच्या ओळखीचे प्रतीक बनते असेही त्यांनी अधोरेखित केले.
परिसंवादादरम्यान रामाणे यांनी आपल्या विविध वास्तुप्रकल्पांच्या उदाहरणांद्वारे पारंपरिक तंत्रज्ञान आणि आधुनिक गरजा यांचा समतोल कसा साधता येतो, याचे मार्गदर्शन केले. स्थानिक कारागिरांचे कौशल्य जपणे आणि त्यांना प्रक्रियेत सहभागी करून घेणे हीच खरी सस्टेनेबिलिटी असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर प्रा. नीला जिरगे, प्रा. कृष्णाली पाटील, निराली गिलबिले, देविका घाटगे, तनया वणकुद्रे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आर्किटेक्चर विभाग प्रमुख आय. एस. जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



