रेशीम उद्योगात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
महारेशीम अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, सांगली यांच्यामार्फत महारेशीम अभियान दि. 11 मार्च 2026 अखेर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विजया यादव, रेशीम विकास अधिकारी आर.जी. कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहायक एस. एम. पाटील, सेवानिवृत्त रेशीम विकास अधिकारी बी. बी. कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
रेशीम रथ जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगांव, आटपाडी, पलूस इत्यादी तालुक्यामधून रेशीम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी व सन 2026-27 च्या रेशीम शेती नोंदणी करण्यासाठी फिरविण्यात येणार आहे.



