सांगली जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक संपन्न
![](https://darpannews.co.in/wp-content/uploads/2023/12/फोटो-जिल्हा-दक्षता-व-ऊसतोड-कामगारांबाबत-बैठक-780x335.jpg)
सांगली : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात संपन्न झाली. बैठकीस समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा, जिल्हा सरकारी वकील यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ऊसतोड कामगार ऊस तोडणीकरीता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होत असतात, अशा कामगारांना ते ज्या जिल्ह्यात ऊस तोडणीकरिता जातील तेथील स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य पुरवठा होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या एक देश एक रेशनकार्ड या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना श्री. बारकूल यांनी दिल्या.
बैठकीत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटी व अन्न धान्य पुरवठा, आरोग्य शिबीर, जिल्हा महिला बाल कल्याण विभागामार्फत देण्यात येणारा पोषण आहार, मृत ऊसतोड कामगारांच्या वारसांना अर्थसहाय्य आदि विषयांचा आढावा घेण्यात आला व संबंधित विभागांना ऊसतोड कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.