दर्पण न्यूज नवी दिल्ली :- नवी दिल्ली येथे आयोजित सिंदूर महारक्तदान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती.
केंद्रीय संरक्षणमंत्री मा. ना. श्री. राजनाथजी सिंह साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे शिवसेना आयोजित ‘सिंदूर महारक्तदान यात्रा आणि शिबिरा’मध्ये आज सहभागी होत आवर्जून रक्तदान केले. ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या त्यागाला कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला.
महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी श्री. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. रक्तदान ही छोटी गोष्ट नाही; एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आपल्या जवानांच्या पाठीशी महाराष्ट्र सदैव खंबीरपणे उभा राहील, हीच भावना या माध्यमातून व्यक्त झाली.
सीमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असलेल्या जवानांच्या पाठीशी महाराष्ट्र रक्तदानातून उभा राहिला आहे, हा संदेश या महारक्तदान यात्रेतून देण्यात आला. जवानांच्या त्यागाला केवळ शब्दांनी सलाम न करता, सेवाभावातून राष्ट्रभक्ती कृतीत उतरविण्याची प्रेरणा या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न आहे. ‘सिंदूर महारक्तदान’ हा केवळ रक्तसंकलनाचा उपक्रम नाही, तर देशाच्या सीमांवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणारी आणि त्यांच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक नमन करणारी राष्ट्रभक्तीची चळवळ आहे.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना यामुळे भारताचे संरक्षण कवच अधिकाधिक मजबूत होत आहे. आपल्या जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण यांना बळ देणाऱ्या या आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी मत व्यक्त केले. तर आदरणीय संरक्षण मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक करत यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उद्योग मंत्री उदय सामंत, व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, पैलवान, कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते.
