– पंपधारकांचे प्रतिनिधी, सेल्स अधिकाऱ्यांची घेतली बैठक
– जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा
– अनावश्यक गर्दी करू नये, अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
दर्पण न्यूज मिरज/सांगली – : सांगली जिल्ह्यामध्ये सामान्य परिस्थितीमध्ये आवश्यक असणारा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले. परिस्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या किंवा चढ्या दराने इंधनाची विक्री करणाऱ्या पंपांचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही. तसेच, जिल्ह्यातील ग्राहकांना नियमित, अखंडित व सुरळीत इंधन पुरवठा सुरू राहण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दि. 19 मे रोजी रात्री विविध पेट्रोल पंपांना अचानक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली व सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच, दि. 20 मे रोजी पेट्रोल, डिझेल पंपधारक यांचे प्रतिनिधी व सर्व सेल्स अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता पंपधारकांनी घ्यावी. इंधनाचा काळा बाजार किंवा साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना दिल्या. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दररोज जिल्ह्यातील इंधनाची एकूण आवक, विक्री आणि शिल्लक साठ्याचा अहवाल घ्यावा. पेट्रोल पंपधारकांनी कोणत्याही एकाच वाहनाला मर्यादेपेक्षा जास्त (उदा. कॅन किंवा बॅरलमध्ये) इंधन न देता सर्वाना समान वाटप करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
सद्यस्थितीत मुख्य डेपोमध्ये आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. आखाती देशातील परिस्थितीमुळे सध्या थेट पुरवठ्यावर कोणताही खंड पडलेला नाही, अशी माहिती ऑईल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सनी बैठकीत दिली. यावर सर्व सेल्स ऑफिसर्सनी त्यांच्या कंपन्यांच्या मुख्य डेपोच्या संपर्कात राहून सांगली जिल्ह्याचा इंधनाचा कोटा कमी होणार नाही आणि पुरवठा साखळीत खंड पडणार नाही, याची दैनंदिन खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ़. मैनाक घोष यांनी दिल्या.
युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरून पंपांवर गर्दी होण्याची आणि काही ठिकाणी इंधनाची साठेबाजी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता पंप धारकांनी घ्यावी. पुरवठा विभागाने पेट्रोल पंपांच्या साठ्याची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ़. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.
इंधनाचा आजचा साठा
जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बीपीसीएलचा 570 किलोलिटर व एचपीसीएलचा 520 किलोलिटर असा एकूण 2410 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1342 किलोलिटर, बीपीसीएलचा 750 किलोलिटर व एचपीसीएलचा 640 किलोलिटर असा एकूण 2732 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 1036 मेट्रिक टन, आयओसीएलचा 55 मेट्रिक टन व बीपीसीएलचा 135.3 मेट्रिक टन असा एकूण 1226.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 73.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.