ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

दर्पण न्यूज मिरज/सांगली : ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्यास मदत होईल, ग्रंथोत्सवाचे स्वरुप वाढवून पुढील वर्षापासून मोठ्या स्वरुपात साजरा करावा, यासाठी शासन व समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव- २०२५ च्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे आयोजित या ग्रंथोत्सवास खासदार विशाल पाटील, पुणे विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रेया गोखले, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, शांतीनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतम पाटील, लेखक दिनकर काकडे, कवी प्रा. संतोष काळे, महेश कराडकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत असून यामध्ये राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधनवाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. गेल्या काही वर्षापासून नवीन ग्रंथालय स्थापन करण्यासाठी शासनाची परवानगी नव्हती. त्यामध्ये आता सुधारणा करुन राज्यात सुमारे 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील ग्रंथालयाची अ, ब, क व ड चे वर्गीकरण करण्याची प्रक्रिया संपुर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार आहे. ग्रंथालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी, ग्रंथालयासाठी पुस्तके ठेवण्यासाठी कपाट खरेदी करणे, फर्निचर करणे यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खासदार व आमदारांना निधी देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याला ग्रंथालयाची मोठी पार्श्वभूमी आहे. जिल्ह्यात 100 वर्षापेक्षा जास्त जुनी ग्रंथालये आहेत. त्यांनाही मदत करण्याची शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट ग्रंथपाल व वाचक यांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आळे. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रंथोत्सव अंतर्गत लावण्यात आलेल्या पुस्तक व ग्रंथ स्टॉलना भेट दिली. ग्रंथोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलवरुन मोठ्याप्रमाणात पुस्तक विक्री झाली.
दरम्यान, ग्रंथोत्सव-2025 अंतर्गत दुसऱ्या दिवशी सकाळी चला, विज्ञानाच्या नजरेतून पर्यावरणाचे संवर्धन करूयात या विषयावर चर्चासत्र पार पडले. यामध्ये डॉ. आर. एस. साळुंखे आणि संजय बनसोडे यांनी सहभाग घेतला. संवादक हर्षा बागल होत्या. पुढील सत्रात विश्वनाथ गायकवाड यांनी कथाकथन सादर केले. यावेळी ज्येष्ठ कवी सुभाष कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रंथालय निरीक्षक अर्चना काळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, ग्रंथालय संघाचे संचालक पांडुरंग सूर्यवंशी, नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक धनंजय माने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल मोहिते यांनी निवेदन केले.
कार्यक्रमास वाचक, साहित्यप्रेमी, सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, ग्रंथप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



