देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती

दर्पण न्यूज मुंबई :- भारताच्या ‘नारी शक्ती’ला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका असून संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गौरवोद्गगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी काढले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीदवारे उपस्थित होते. यावेळी ‘वर्षा’ निवासस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ अशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, कुटुंबात आई आजारी पडली तर संपूर्ण घर विस्कळीत होते. आई निरोगी असेल तर कुटुंब कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे” उज्ज्वला गॅस योजना, सॅनिटरी पॅड उपलब्धता आणि शौचालय उभारणी यांसारख्या ‘मिशन मोड’ उपक्रमांचा उल्लेख करुन ते म्हणाले, सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक आहारासाठी महिलांच्या खात्यात 5,000 रुपये जमा केले जात आहेत.
17 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.
पायाभूत सुविधांबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जोडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलत आहे. “दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी ‘संधींची भूमी’ बनत आहे” असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशापासून समृद्धी मिळविण्याची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत, सरकार छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रूपयांची मदत देते, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबाला समृद्ध जीवन मिळेल अशा “विकसित राजस्थानपासून विकसित भारत” या मंत्राचा पुनरुच्चार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या विकास प्रवासातील या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले.



