सांगली येथील महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित काढा, अन्यथा मतदानावर बहिष्कार घालणार : महार वतन जमीन बचाव संघर्ष समितीचा इशारा
सांगली :- महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून टाका अन्यथा मतदानावर बहिष्कार घालणार, असा इशारा महार वतन जमीन बचाव संघर्ष समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. या बाबतचे निवेदन शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहराच्या हद्दीमधील महार वतन जमीन बचाव संघर्ष समितीच्या वतीने सांगली हद्दीमध्ये कत्तलखाना, पी. आर. पाटील रोड ते गारपीर रोड स्विमिंग टँकच्या दक्षिण बाजूला महार वतन जमीन वर्ग दोन ह्या जमिनी कुदळे, गोंधळे, काळे आणि कांबळे या लोकांची इनामी जमीन असून या जमिनीवर येथे या लोकांचे पूर्वज आपला उदरनिर्वाह या जमिनीवर करत होते. परंतु काही राजकीय लोकांनी या लोकांचा गरिबीचा अशिक्षित पणाचा त्याच बरोबर त्यांच्या व्यसनाचा गैरफायदा घेऊन तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, सरकार तुमच्या जमिनी काढून घेणार आहेत असं खोटं सांगून, फसवून 10 रुपये आणि 20 रुपयांच्या साध्या स्टॅम्पवर अधिकृत खरेदीपत्र न करता कवडीमोल किंमतीने बळकावले. या लोकांना या जमिनीवरून हाकलून लावलं व टप्प्याटप्प्याने ह्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या कब्जा व अतिक्रमण केले.
अशाप्रकारे अनधिकृत बेकायदेशीर रित्या या सरकारच्या इनाम जमिनीवर कोणत्याही प्रकारचा महसूल न देता अथवा महार वतन खालसा न करता या जमिनीवर अशा लोकांनी अतिक्रमण करून या पट्ट्याच्या 35 एकरामध्ये गुंठेवारी रेखांकनाकडे आणून शेतजमिनीचा नागरी वस्ती मध्ये रूपांतर करून या लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन समस्त महार, बौद्ध समाजातील लोकांना फसवण्याचे काम या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या लोकांनी केलेले आहे आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बेकायदेशीर या जमिनीवर झालेले अतिक्रमण गुंठेवारी रेखांकनांमधील यांना ज्या बेकायदेशीरपणे लाईट कनेक्शन व पाणी कनेक्शन दिले आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी व लाईट कनेक्शन ताबडतोब बंद केले पाहिजे. तसेच अतिक्रमण केलेल्या व महार वतन जमिनीवर सध्या राहत असलेल्या आमच्या समाजाच्या लोकांच्यावर अतिक्रमण केलेल्या लोकांच्याकडून दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्या परिसरात ताबडतोब पोलीस चौकी उभा करून त्या लोकांचे संरक्षण करावे अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या समितीच्या वतीने केलेली आहे.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धार्थ कुदळे म्हणाले की, शासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिला नाही तर लोकसभेच्या मतदानावर आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल. अधिकृत खरेदीपत्र न करता शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल या अतिक्रमण करणाऱ्यांनी बुडविलेला आहे.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे म्हणाले की, पूर्वीचा गोंधळे प्लॉट आणि आत्ताचा मुजावर प्लॉट यावरील घुसखोरांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून घेऊन आम्हाला सहकार्य करावे अन्यथा आम्हाला काढून टाकावे लागेल.
यावेळी बोलताना शेखर कांबळे म्हणाले की, आलिशान चौकामधील झालेले बेकायदेशीर अतिक्रमण यांना दिलेले नळ कनेक्शन व वीज कनेक्शन ताबडतोब बंद करावे.
निवेदन देताना यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश दुधगावकर, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव,भारतीय ब्लू पॅंथरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गोंधळे, प्राध्यापक संजय कांबळे, आकाश गोंधळे, किसन लोखंडे, अरुण वाघमोडे, राजेंद्र गोंधळे, बटू परदेशी, संदीप कांबळे शुभम गोंधळे, नितीन कांबळे आदि उपस्थित होते.