लोक संकटातून कसे सावरून पुन्हा कसे उभे राहिले याची कथा सांगण्यासाठी जनजागृती करणे हे चित्रपट निर्माता म्हणून माझे कर्तव्य : धनीराम टिसो, कर्बी फीचर फिल्म ‘मीरबीन’ चे निर्माते
गोवा/पणजी : अभिजीत रांजणे :-
दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी आज गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही आडपडदा न ठेवता संवाद साधला.
कार्बी आंगलाँगला ग्रासलेल्या कट्टरतावाद्यांच्या संघर्षाचे, मीरबीन हा चित्रपट म्हणजे अस्सल चित्रण आहे. आमचा हा चित्रपट सत्य आणि वस्तुस्थितीची कथा आहे, असे दिग्दर्शक मृदुल गुप्ता यांनी सांगितले.
लोक आपल्या मुळांवर आघात होत असूनही संकटाशी टक्कर देणाऱ्या लवचिकतेचे प्रदर्शन करत पुन्हा उठून उभे राहत आहेत हे प्रसंग जिवंत करण्यासाठी,संपूर्ण चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये झाडाची मुळे कथेला एक मजबूत प्रतीकात्मक कमान देत वापरली आहे, असे चित्रपटात वापरलेल्या मुळांच्या प्रतिकाबद्दल बोलताना लेखिका मणिमाला दास यांनी सांगितले.
मणिमाला दास पुढे म्हणाल्या की, चित्रपटातील संगीत खऱ्या अर्थाने केवळ पारंपरिक कार्बी धून वापरून केलेले अस्सल संगीत आहे. “आम्हाला आशा आहे की प्रेक्षक आमच्या चित्रपटाद्वारे कार्बींबद्दल सहानुभूती दाखवतील आणि कार्बीचा संघर्ष अनुभवतील,” असे लेखिका मणिमाला यांनी सांगितले.
मणिमाला दास यांनी चित्रपटातील हातमागाच्या महत्वाबद्दल सांगितले. आसाममधील संघर्षात अडकलेल्या लोकांसाठी वस्त्रोद्योग हा पुनर्प्राप्तीचा आणि मुक्तीचा मार्ग ठरला. मीरबीन सुद्धा तिच्या बालपणीच्या सर्दीहुन, या कर्बी आदिवासी रिवाजातील, वस्त्रांच्या मायावी देवीच्या कथांमधून प्रेरणा घेते. नव्या आशा आणि उद्दिष्टांसह ती संकटातून यशस्वीपणे बाहेर पडते.
या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना निर्माते धनोराम टिसो म्हणाले, “चित्रपट निर्माता म्हणून जनजागृती करणे, लोक संकटातून कसे सावरले आणि अंध:कारमय भूतकाळाच्या छायेतून बाहेर पडून कसे नव्याने बहरले याची कथा सांगणे हे माझे कर्तव्य आहे.”
वेगवान आणि चैतन्यपूर्ण आसामी चित्रपटाचे प्रतिनिधित्व करणारा मीरबीन, ईफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या 15 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे आणि महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात तो दाखवण्यात आला.
मीरबीन ही आशा आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या प्रवृत्तीची आकर्षक कथा आहे. ही कथा, तिची मध्यवर्ती नायिका मीरबीन अथक संकटांना तोंड देत आपल्या स्वप्नांना कशी घट्ट धरुन ठेवते याबाबतचा जीवनप्रवास उलगडते. तिच्या संघर्षात, ती कार्बी लोकांच्या वेदना आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे मूर्तीमंत प्रतिक बनते.