दर्पण न्यूज मिरज /सांगली : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेअंतर्गत आधुनिक सिंचन सुविधा, शेतीपूरक साधने आणि कृषी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 90 टक्के अनुदान अथवा कमाल 2 लाख रुपये (आकारमानानुसार अनुदान देय), इनवेल बोअरिंग व पंप संच 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत 90 टक्के अनुदान अथवा 40 हजार रुपये, पीव्हीसी/एचडीपीई पाईप व सोलर पंपासाठी 100 टक्के अनुदान अथवा 50 हजार रुपये, ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान किंवा 47 हजार रूपये व 97 हजार रूपये (पूरक अनुदान), कृषी यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रूपये व परसबाग विकासासाठी 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (www.mahadbt.maharashtra.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर जमीनधारणा असावी. दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थ्यांना जमीन मर्यादेची अट लागू राहणार नाही. निवड प्रक्रिया “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (FCFS) या तत्त्वावर होणार असून महिला, दिव्यांग व बीपीएल शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
