सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वाधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईच्या हाताला काम देऊन बेरोजगारीवर मात करण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग काम करत आहे. या माध्यमातून युवाशक्तीला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची जोड दिली जाते. या विभागाच्या योजनांची माहिती आजच्या लेखात घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच, उद्योजकांशी समन्वय साधून त्यांची नोंदणी केली जाते व त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कुशल उमेदवार पुरवले जातात. बेरोजगार उमेदवारांची नोंदणी केली जाते व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. विभागाच्या पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, पात्रतेत वाढ, पत्ता बदल इत्यादि करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजकांना रिक्त पदे अधिसूचित करणे, विवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत. या विभागामार्फत विविध कौशल्य विकास योजना राबविल्या जातात. केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान करून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी व महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास सोसायटी मार्फत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA, किमान कौशल्य विकास कार्यक्रम (जिल्हा नियोजन समिती निधीतून), पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता (RPL) SANKALP – Skill Acquisition and knowledge Awareness Livelihood Promotion या योजनांचा समावेश आहे. रोजगार मेळावे : ही योजना नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी असून, उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छताखाली आमंत्रित करणे. रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना अनेक उद्योजकांकडे एकाच ठिकाणी मुलाखतीची संधी प्राप्त होते व उद्योजकांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची उपलब्धता करुन देण्यात येते....