बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली – : शासकीय बियाणे पुरवठा कंपनी महाबीज, एन.एस.सी. यांचेकडून होणारा बियाणे पुरवठा मुबलक प्रमाणात करून घ्यावा व तो शेतकऱ्यांना रास्त दराने उपलब्ध करून देणेच्या सूचना देवून बियाणे उत्पादक कंपन्यांकडून होणारा पुरवठा हा कमी प्रमाणात होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक आज रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा निविष्ठा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, कृषी विकास अधिकारी धनाजी पाटील, मोहीम अधिकारी स्वप्नील माने, पोलीस निरीक्षक सतीष कदम, विक्रेते प्रतिनिधी ललितकुमार दबडे, अमित शहा, संजय निलावार, माथाडी कामगार निरीक्षक नितीन सलगर, कंपनी प्रतिनिधी ज्ञानेश्वर ढेबे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही शेतकऱ्यांना बियाणांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, बियाणे उत्पादक कंपनी प्रतिनधी यांचेशी समन्वय साधून मागणीप्रमाणे बियाणे उपलब्ध करणेचे नियोजन करावे अशा सूचना देवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मागणीच्या तुलनेत बियाणे पुरवठा कमी झाला आहे. याबाबत मागील वर्षाची मागणी, पेरणीक्षेत्र, बियाणे पुरवठा याबाबतची सविस्तर माहिती सादर करावी व शासकीय बियाणे पुरवठा कंपनी महाबीज, एन.एस.सी. यांचेकडून होणारा बियाणे पुरवठा मुबलक प्रमाणात करून घ्यावा व तो शेतकऱ्यांना रास्त दराने उपलब्ध करुन द्यावा.
जिल्ह्यासाठी आवश्यक युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी व एनपीके खतांची १ लाख ८९ हजार ३५४ मेट्रीक टन खतांची मागणी केली असून १ लाख ३८ हजार ०९७ मेट्रीक टन खत साठा मंजूर झाला आहे. खताची टंचाई निर्माण होणार नाही याबाबत कृषी विभागाकडून योग्यती दक्षता घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या खतांची टंचाई नसून युरीया खताला पर्याय म्हणून नैनो युरीया या खताचा वापर वाढविण्यावर भर देणेकामी मोठ्या प्रमाणात प्रचारप्रसिध्दी करणेत येत आहे. तसेच नॅनो युरीयाचा पुरवठा हा मागणी केलेल्या युरीया व्यतिरिक्त असलेने टंचाई निर्माण होणार नसून त्याचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसून येत आहे. तसेच शेतकन्यांकडून सेंद्रीय व नैसर्गिक खतांचा वापर वाढत असलेची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.