दर्पण न्यूज धाराशिव : प्रतिनिधी( संतोष खुने) :-
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी तीव्र निषेध केला आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून जालना येथील संजय इंचे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या सभेत केलेल्या “महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांनी निर्माण झाली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचा लढा दिला, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी सामाजिक न्यायाची दारे खुली केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेचा संदेश दिला.
अशा महापुरुषांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या सामाजिक अस्मितेला धक्का देणारे असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे राजाभाऊ राऊत यांनी म्हटले आहे.
“महापुरुष हे कोणत्याही एका समाजाचे किंवा पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राची वैचारिक संपत्ती आहेत. त्यांच्या विचारांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींवर शासनाने कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ तपासून तातडीने गुन्हा दाखल करावा, भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे