दर्पण न्यूज धाराशिव, प्रतिनिधी( संतोष खुने) – : धाराशिव येथील बस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 21 व 22 समोरील परिसरात दुचाकी वाहनांची वाढती अनधिकृत गर्दी ही गंभीर समस्या बनली असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असा आरोप आरपीआय (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे.
बस स्थानकातील या दोन्ही प्लॅटफॉर्मसमोर मोटरसायकली अव्यवस्थितपणे उभ्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांच्या ये-जा मार्गात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी अपघाताचा धोका वाढत असून आपत्कालीन सेवांना मार्ग मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म क्रमांक 22 वरून नाशिक, भिवंडी, लासलगाव, सूरत, अहमदनगर व भूम या महत्त्वाच्या मार्गांवरील बसेस सुटतात, तर प्लॅटफॉर्म क्रमांक 21 वरून भूम, येरमाळा, येडशी व वाशी या मार्गांवरील बसेस सुटतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असतानाही दुचाकींच्या अनधिकृत पार्किंगकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म परिसरात दुचाकी पार्किंगस कडक बंदी घालावी, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीआय (खरात गट) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.