हिंगणगाव येथे विहिरीत पोहायला गेलल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
कवठेमहांकाळ( प्रतिनिधी) : कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी ( वय 17) याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला.सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या काठावरील पिंटू पाटील यांच्या विहिरीत पोहायला गेले होते. इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकणारा श्रेयस हा पोहायला शिकत होता. सकाळी पाठीला टायर ट्यूब बांधून तो विहिरीत उतरला. परंतु काही क्षणांतच पाठीला बांधलेली ट्यूब निसटली गेल्याने तो बुडू लागलात विहिरीत पोहणारे त्याचे तीन चार मित्रांनी वाचवायचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही.
सदरची माहिती समजताच सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील व गावकरी विहिरीजवळ गोळा झाले. विहिरीत 50 ते 60 फूट पाणी होते. दोन तीन तास शोधूनही मृतदेह सापडला नाही. अखेर हिंगणगांवचे माजी उपसरपंच अनंत पाटील यांनी प्रयत्न करून त्यांच्या परिचयातील सांगली येथील बचाव पथकाला बोलावले.
कवठेमहांकाळचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सांगली येथील आयुश हेल्थ केअरच्या बचाव पथकातील तीन चार जवानांनी तीन चार तास पाण्यात बुडून शोध घेतला. बचाव पथकाच्या जवानांनी चार तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.