रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : प्रत्येक जीव अमूल्य आहे. वेग मर्यादा, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर आदि रस्ता सुरक्षा नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. घरातून बाहेर पडताना सुरक्षित परत येईन असा संकल्प करावा. रस्ता सुरक्षा अभियान प्रत्येक घरातून व मनातून सुरू व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली, सांगली जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहत येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी, जयंत सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, रस्ता सुरक्षा सर्वांसाठी महत्वाची आहे. गाडीत बसल्यावर सीट बेल्ट आवर्जून घालावा, वेगावर नियंत्रण ठेवावे, बाईक चालविणाऱ्यांने तसेच त्याच्या मागे बसणाऱ्यांनीही हेल्मटे वापरावे. प्रत्येक नियमांची सक्ती करण्याची गरज भासू नये, स्वत:हून नियमांचे पालन करावे. आपल्या जीवाच्या सुरक्षितेसाठी स्वत: सतर्क असावे. कोठेही जाताना विहीत वेळेच्या अगोदर निघून सुरक्षित पोहचावे. गतवर्षी सर्वांनी एकत्रित काम करून जवळपास 14 ब्लॅक स्पॉट कमी केले आहेत. उर्वरित ब्लॅक स्पॉटवरती यावर्षी काम सुरू करीत आहोत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये रस्ते अपघाताबाबत चर्चा करून उपाययोजना केल्या जातात. नागरिकांनी याबाबत त्यांच्या काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे ते म्हणाले.
ज्यांचे ट्राफिक चलन भरणे प्रलंबित आहे ते त्यांनी तात्काळ भरावे, जेणेकरून गाडी चालवित असताना रस्त्यामध्ये ट्राफिक पोलिसांच्या तपासणीवेळी कोणताही मनावर ताण असणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आरटीओ व ट्राफिक पोलिसांनी जे अल्पवयीन वाहन चालवित आहेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. लांब प्रवास करणाऱ्या ट्रव्हल्सचे फिटनेस तपासावे. पॅसेंजर घेऊन जाणाऱ्या सर्व वाहनाच्या फिटनेसवर लक्ष ठेवावे. वाहनांच्या ओव्हरलोडींगबाबत प्रबोधन करावे, जर प्रबोधन करूनही नियमांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. अपघात झाल्यानंतर शरिराला नेमके काय नुकसान होते याबाबतची चित्रफीत सिनेमा थिएटरमध्ये दाखवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी यांनी रस्तावरून जाताना सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असे सांगून रस्ते सुरक्षाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी व जयंत सावंत यांनीही रस्ता सुरक्षेबाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुरक्षाबाबत जनजागृतीसाठी ड्रायव्हींग स्कूल वाहनांच्या रॅलीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सुरू होवून पुढे लव्हली सर्कल, विश्रामबाग चौक, पुष्कराज चौक, काळीखण, टिंबर एरिया, लव्हली सर्कल मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. तसेच रस्ता सुरक्षा प्रबोधनाबाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
प्रास्ताविकात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा हेतू विशद करून अपघात रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच जनजागृतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच 15 जानेवारी ते 14 फेब्रवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून या अंतर्गत रस्ता सुरक्षा प्रबोधनाबाबत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी रस्ता सुरक्षाबाबतच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांनी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. सूत्रसंचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक सुनिल मुळे यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रमास ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी, आरटीओ, पोलीस तसेच अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.