औदुंबर येथील 81वे साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, कविसंमेलन अध्यक्षपदी मनिषा पाटील यांची निवड
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील औंदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाचे ८१ वे साहित्य संमेलन, औदुंबर-अंकलखोप येथे सोमवार दि. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न होणार आहे. प्रारंभी
कवी संमेलन १२ ते ३ या वेळेत होणार आहे. यावेळच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री मनिषा पाटील (देशिंग-हरोली, सांगली) यांची निवड करण्यात आली आहे.
तर या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत व लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सातारा यांची निवड झाली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ ते ६ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन संपन्न होत आहे.
तसेच कवितासंग्रहासाठी
सुधांशु पुरस्कार ‘थकीत एकूण गोषवारा’ या कवितासंग्रहासाठी गजानन शिले, वाशिम यांना तर
व कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार ‘मातीचा देह’ या कवितासंग्रहासाठी सुनंदा बोरकर, नागपूर यांना जाहीर झाला आहे. संमेलनादिवशी अध्यक्षांच्या हस्ते हे प्रदान करण्यात येणार आहेत.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. भिमराव धुळूबुळू, मिरज यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
अशी माहिती मंडळाचे कार्यवाह पुरूषोत्तम जोशी, अध्यक्ष शहाजी सुर्यवंशी, उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, गिरीश जोशी यांनी दिली.
कवी संमेलन अध्यक्षा मनीषा पाटील-हरोलीकर या
श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर काॕलेज आॕफ आर्ट्स,देशिंग-हरोली येथे
अध्यापिका म्हणून काम करतात
त्यांचे ‘माती विश्व’, ‘पायवाटेवरील दिवे’, ‘नाती वांझ होताना’ आदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरोली, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान देशिंग, चारुता सागर प्रतिष्ठान कवठेमंकाळ, शिक्षक परिषद कवठेमंकाळ, इंग्लिश टीचर्स असोसिएशन कवठेमंकाळ, कैलासवासी सूर्यकांत पाटील फाउंडेशन हरोली
अशा विविध संस्थामार्फत साहित्य विश्वात त्या अग्रेसर आहेत.
संमेलन अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे.
डॉ. दाभोळकर यांची
छाया (कवितासंग्रह),
ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह),
तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय,
दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत,
ना डावंना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख),
प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे),
बखर राजधानीची,
(समग्र) माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक),
राजधानी इंद्रप्रस्थ,
विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला),
शोध स्वामी विवेकानंदांचा
समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक) आदी विपुल ग्रंथ संपदा प्रकाशित आहे.