साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्या : जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे

सांगली, दि. 3 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथील कार्यालयात सादर करावेत. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले आहे.
श्री. गिऱ्हे म्हणाले, मातंग व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादींगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान बीजभांडवल योजनेंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण 40 लाख उद्दिष्टाची तरतूद आहे. यामध्ये अनुदान योजनेंतर्गत 30 लाखांची तरतूद आहे. यामध्ये 300 प्रकरणे केली जातील. बीज भांडवल योजनेंतर्गत 10 लाभार्थीकरीता 10 लाखाचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आले आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारापर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
बीज भांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 रूपये ते 7 लाखापर्यंत आहे. 50 हजार 1 रूपये ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रूपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदाराचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रूपये अनुदानासह) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे. बीज भांडवल योजनेचे केवळ 10 कर्जप्रकरणांचे उद्दिष्ट असल्याने दि. 18 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या दोन्ही योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. गरजूंनी विहीत नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घ्यावेत, असेे आवाहनही श्री. गिऱ्हे यांनी केले आहे.