कोरोनामुळे माध्यमावर मोठे संकट
केंद्र आणि राज्य सरकारने आधार देण्याची गरज- वसंत मुंडे
मराठवाड्यातील पत्रकारांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद
बीड प्रतिनिधी
कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरात होत आहे.संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.याचा फटका सर्वच विभागांना बसत असून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. लोकशाहीच्या या चौथ्या खांबाला टिकवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेजद्वारे सहकार्य करणे गरजेचे आहे अशी भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केंद्र आणि राज्य शासनाच्या दरबारी प्रखरपणे मांडणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत माध्यमांची परिस्थिती यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पत्रकार संघाचे मराठवाड्याचे प्रभारी संघटक वैभव स्वामी यांनी या सुसंवादाचे आयोजन केले. यावेळी मराठवाड्यातील जालना, हिंगोली,औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारानी प्रत्यक्ष सहभाग घेवून निर्माण झालेल्या समस्यावर चर्चा केली.प्रमुख्याने लॉक डाऊन परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे.बहुतांश वृत्तपत्र बंद आहेत जे वृत्तपत्र प्रसिद्ध होत आहेत त्या वृत्तपत्रांना जाहीरातीचा व्यवसाय राहिलेला नाही.शिवाय जाहिरातींच्या थकबाकी वसूलीवर मोठा फटका बसत आहे.अशा परिस्थितीत स्थानिक आणि मोठे वृत्तपत्र हतबल झाल्याने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील कर्मचाऱ्यांवर कपातीचे संकट कोसळत आहे.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहीजणांच्या धोक्यात आलेल्या आहेत.जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांवर पंचवीस ते साठ टक्के पर्यंत पगार कपातीचे संकट ओढवलेले आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य शासन कोणत्याही कंपन्यांनी, संस्थेने कर्मचाऱ्यांची कपात करू नये,अशा भीषण संकटात आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि पूर्ण देऊन त्यांना सहकार्य करावे अशी भूमिका स्पष्ट केलेली असताना सुद्धा वृत्तपत्र व्यवसायातील मालक आणि संपादक मंडळी मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत.शिवाय पगारामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे. या प्रमुख प्रश्नांसोबतच केंद्र आणि राज्य सरकारने पत्रकारांना कुठलाही विमा अथवा आर्थिक पॅकेजचा आधार दिलेला नाही. तरी देखील प्रसार माध्यमातील पत्रकार आणि श्रमिक कामगार मंडळी आपला जीव दावणीला बांधून कोरोना संदर्भातील अपडेट वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला प्रशासनाला आणि शासनाला देण्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.तेव्हा माध्यमातील पत्रकार आणि श्रमिक कामगारांना आधार देण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घ्यावा अशी भूमिका मराठवाड्यातील सहभागी झालेल्या अनेक पत्रकारांनी व्यक्त केली.यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यासंदर्भात सर्वप्रथम पत्रकार संघाने केंद्र शासन आणि मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक पॅकेजची मागणी केलेली आहे शिवाय विमा काढण्यात यावा ही देखील मागणी केलेली आहे.ज्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले आहे अथवा पगारी मध्ये कपात केली आहे अशा कर्मचाऱ्यांनी जर लेखी स्वरूपात पत्रकार संघाकडे आपली व्यथा मांडली तर यासंदर्भात शासन दरबारी आणि संबंधीत संस्थेकडे न्याय मागण्यात येईल.जर न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन संघर्ष करून या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पत्रकार संघ आग्रही भूमिका घेईल अशी भूमिका स्पष्ट केली.प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पहिल्यांदाच थेट संवाद साधून प्रत्येक पत्रकारांची आस्थेवाईकपणे चौकशी करून दिलासा दिल्याने पत्रकारांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
Share