सांगली जिल्ह्यात 97 निवारा केंद्रात 36220 व्यक्ती : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
नऊ कम्युनिटी किचन मधून 1258 जणांची भोजन व्यवस्था
सांगली :. कोरोना संसर्गापासून बचावासाठी घराबाहेर न पडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे जेथे आहात तेथेच राहा असे आवाहन शासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जिल्हाबंदी यासारख्या विविध् अंगी उपाय योजना करण्यात येत आहेत. रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे. यासह जिल्ह्यात एकूण 9 कम्युनिटी किचन अंतर्गत 1258 लोकांना जेवण देण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 11, जत तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 61 लोकांना, खानापूर तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 22 लोकांना, आटपाडी तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 96 लोकांना, कडेगाव तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 20 लोकांना ,वाळवा तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 102 लोकांना, शिराळा तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 44 लोकांना जेवण देण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 1921 व्यक्ती, तासगाव तालुक्यात 1 निवारा केंद्रामध्ये 155 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यात 3 निवारा केंद्रामध्ये 481 व्यक्ती, जत तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 व्यक्ती, खानापूर तालुक्यात 18 निवारा केंद्रात 2576 व्यक्ती, आटपाडी तालुक्यात 6 निवारा केंद्रात 788 व्यक्ती, पलूस तालुक्यात 8 निवारा केंद्रात 7648 व्यक्ती, कडेगाव तालुक्यात 19 निवारा केंद्रामध्ये 10 हजार 246 व्यक्ती, वाळवा तालुक्यात 18 केंद्रामध्ये 10 हजार 964 व्यक्ती, शिराळा तालुक्यात 3 केंद्रामध्ये 229 तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 902 व्यक्ती आहेत. अशा एकूण 97 निवारा केंद्रामधून 36 हजार 220 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे.
यामध्ये साखर कारखाना कॅम्पमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तसेच 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.