परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवांसाठी 5360 परवाने वितरित : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे
सांगली : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून या कालावधीत अत्यावश्यक सेवांनासाठी परिवहन विभागाकडून आता पर्यंत 5 हजार 360 वाहतुक परवाने वितरीत करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तथापि, यामध्येही जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा पडू नये तसेच आपतकालिन स्थितीमध्ये उदभवणाऱ्या समस्यांसाठी वाहने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आली आहे. आणि प्रत्येक तहसिल कार्यालयांशी त्यांना जोडून देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंची सेवा सुरळीत व्हावी व अत्यावश्यक सेवा सुरळीत चालाव्यात यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात या कालावधीत 5 हजार 360 वाहतुक परवाने वितरीत करण्यात आले आहेत.
यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, 11 निरक्षक, 27 सहायक निरिक्षक कार्यरत असून 10 तालुक्यातील 10 तहसिदार कार्यालयात व परिवहन मुख्यालय, सांगली येथे एक ठिकाणी अशा एकूण 11 ठिकाणांहून परवाने वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच दोन अत्यावश्यक स्कॉड नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मुख्यालयात 24 तास कंट्रोल रुम सुरु ठेवण्यात आले असून या कंट्रोल रुमचा क्रमांक 0233-2310555 असा आहे. तसेच mh10@mahatranscom.in हा ईमेल आयडीही वाहतुकदारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.